Skip to main content

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे.

शाळेची प्राथमिक माहिती

शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे.

शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती

शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती, जागरूकता समिती, सूचना समिती, सुरक्षा समिती, वहातुक व्यवस्थापन समिती, प्रसार माध्यम समिती या उपसमित्या गठीत कराव्यात.

इमारती नुसार विस्तृत माहिती

विभाग किंवा इमारतीचे नाव, एकूण खोल्यांची संख्या, फक्त वर्गांची संख्या, विद्यार्थ्यांचे वयोगट किंवा इयत्ता, छताच्या बांधकामाचे स्वरूप ( लाकडी, पत्रा, सिमेंट ), इमारतीचे वय वर्ष या बाबत विस्तृत माहिती नोंद करावी.

शाळेच्या मैदानाविषयी विस्तृत माहिती

शाळेच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या मैदानात मैदानाचा प्रकार, खो- खो मैदान, कबड्डी मैदान, प्रार्थना मैदान व इतर मैदान याबाबत माहिती लिहून त्यात मैदानाचे एकूण क्षेत्रफळ व मुख्य रस्त्यापासूनचे अंतर याबाबत विस्तृत माहिती नोंद करावी.

शाळेची दिनचर्या

शाळेची दैनंदिन दिनचर्या काय असते? शाळा भरण्याची, मधल्या सुट्टीची, जेवणाच्या सुट्टीची व शाळा सुटण्याची वेळ तसेच शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम याविषयी माहिती नोंदविणे आवश्यक आहे.

शाळेतील संभाव्ये धोके

संभाव्ये धोक्याचे नाव, स्वरूप ( साधे, मध्यम, तीव्र ), पुर्वी झालेले नुकसान, सध्या केलेली उपाय योजना या बाबतची माहिती नोंद करावी.

शाळेची रंगीत तालीम

शाळेतील मुलांची रंगीत तालीम ही शाळेतील संभाव्ये धोक्यांना व नैसर्गिक आपत्तींना अनुसरून घेण्यात यावी. उदा. भूकंप, पूर, वादळ, आग, प्रथोमोपचार इत्यादी. तसेच उपस्थित विद्यार्थी संख्या, दिनांक व वेळ, कमतरता याचीही माहिती नोंद करणे आवश्यक आहे.

शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा

आपत्ती व्यवस्थापन नकाशात शाळेच्या सर्व इमारती, त्यांची रचना, मैदाने, प्रवेश व्दार, शाळेतील संभाव्ये धोक्यांच्या जागा, आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा, जवळचा रस्ता या सर्व बाबी त्यात दाखवणे आवश्यक आहे. या नकाशा बाबत शाळेतील सर्व मुलांना कल्पना देऊन  तो शाळेच्या प्रवेशव्दाराजवळ लावण्यात यावा.

आपत्कालीन संपर्क क्रमांक

आपत्तीच्या प्रसंगी मदत मिळावी यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक संकलित करून ते शाळेत व मुख्य प्रवेश व्दाराजवळ लिहिणे आवश्यक आहेत. त्यात गावपातळीवरील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शिपाई, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, गावात उपलब्ध साधन सामुग्री व उपलब्ध मनुष्यबळव तालुका पातळीवरील तहशिलदार,गटविकास अधिकारी,गट शिक्षण अधिकारी, पोलीस, तात्काळ आरोग्य सेवा, रक्त पुरवठा सेवा, लाचलुचपत प्रतिबंध विभाग,जिल्हा अधिकारी, पोलीस अध्यक्षक, जिल्हा शल्यचिकित्सा, कृषी आधिक्षक, महिला व बालविकास कार्यालय, समाज कल्याण, जिल्हा पुरवठा,अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी अशा दोन्हीही स्तरावरील क्रमांक संकलित करणे आवश्यक आहेत.

Comments

Popular posts from this blog

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... .... भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ... कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन ! सविस्त...